TOD Marathi

अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election)) मतदान करता येणार नाही आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने दोघांचेही अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे सहाव्या जागेसाठी मतांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

अनिल देशमुख व नवाब मलिक हे दोघेही वेगवेगळ्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे विधानभवनात जाऊन मतदान करता यावे याकरता एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळण्याबाबत दोघांनी केलेले अर्ज फेटाळून लावावेत’ असे म्हणत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) (ED) प्रतिज्ञापत्रावर मंगळवारी दोघांच्या अर्जांना विरोध दर्शवला होता.

राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्या मतदानालाही महत्त्व आहे. देशमुख आणि मलिक दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नवाब मलिक हे न्यायालयाच्या परवानगीने सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ‘वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णवाहिनीतून विधानभवनात जाऊ देण्याची आणि मतदान केल्यानंतर रुग्णालयात परतण्याची मुभा द्यावी, यासंदर्भातील खर्च व पोलिस सुरक्षेचा खर्च उचलण्याची माझी तयारी आहे’, असे नवाब मलिक यांनी आपल्या अर्जात म्हटले होते.

मात्र नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांच्याही अर्जाला न्यायालयाने फेटाळले आहे.